67 अल - मुल्क
Dominion(The sovereignty)
*आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.
1 असीम समृद्ध आहे तो, ज्याच्या हाती समस्त विश्वाची (ची) सत्ता आहे. प्रत्येक वस्तुमात्रावर त्याचेच नियंत्रण आहे. 2 त्यानेच तुमची कसोटी पाहण्यासाठी जीवन व मृत्यू निर्माण केले. तुमच्यापैकी कोण चांगली कामे करतो, (हे त्याला पाहायचे आहे). तो सर्वशक्तिमान (असूनही) फार क्षमाशील आहे. 3 ज्याने एकावर एक असे सात आकाश निर्माण केले. कृपावंत (अल्लाहच्या) निर्मितीमध्ये तुम्हाला कोणताही दोष असल्याचे आढळून येणार नाही. (एकदा पाहिल्याने दोष न आढळल्यास) पुन्हा एकदा पाहा, की , तुम्हाला आढळतो का कुठे काही दोष ? 4 मग आणखी पुन्हा - पुन्हा पाहा, (प्रत्येक वेळेस) तुमच्या (दोष शोधणाऱ्या) नजरा थकून व निराश होऊन तुमच्याकडे परततील (पण अल्लाहच्या निर्मितीमध्ये दोष कुठेही आढळणार नाही).
5 आणि आम्ही पृथ्वीसाठी सर्वात जवळ असलेल्या आकाशाला दिव्यांनी सजवलेले आहे. आणि (वाईट हेतूने आपल्या मर्यादा ओलांडणाऱ्या) सैतानांना पिटाळून लावण्याचे त्यांना साधन बनविले आहे.आणि त्यांच्यासाठी धगधगत्या आगीची (भयंकर) शिक्षा तयार आहे. 6 ज्या लोकांनी आपल्या पालनकर्त्याला मानण्यास नकार दिला त्यांच्यासाठी नरकाची (भयंकर) आग तयार ठेवलेली आहे. (खरोखर) ते फारच वाईट ठिकाण आहे. 7 जेव्हा त्यांना तिच्यात टाकले जाईल, तेव्हा तिची (भयंकर) गर्जना ते ऐकतील आणि ती उसळी घेत असेल. 8 जणू तिच्या क्रोधाचा स्फोटच होत आहे. प्रत्येक समूह जेव्हा तिच्यात टाकला जाईल, तिचे रखवालदार (प्रत्येक समूहाला) विचारतील, ' तुमच्याकडे कोणी सावध करणारा आला नव्हता का ?' 9 ते उत्तर देतील, ' अर्थातच, सावध करणारा आमच्याकडे आला होता, पण आम्ही त्यास खोटे ठरविले होते आणि आम्ही त्यास म्हटले होते, 'अल्लाहने काहीही प्रकट वगैरे केलेले नाही.' तुम्ही (स्वयंनियुक्त पैगंबर अल्लाहच्या संदेशाचे नाटक करून) चुकीच्या मार्गी लागलेले आहात ' 10 आणि ते म्हणतील, ' जर आम्ही त्यांचे म्हणणे ऐकले असते आणि (निदान) आमच्या बुद्धीचा वापर केला असता, तर आता आम्ही नरकवासीयांपैकी झालो नसतो.' 11 आणि अशाप्रकारे ते आपल्या अपराधाची कबुली देतील. तर नरकवासीयांवर सर्वप्रकारे अल्लाहची अवकृपा होवो!
12 (या उलट) जे लोक आपल्या पालनकर्त्याला न पाहताही त्याच्याप्रति भीतीयुक्त आदर बाळगतात. त्यांना (अल्लाहकडून) क्षमा व फार मोठे बक्षीस प्राप्त होईल.
13 (लोकांनो !) तुम्ही काहीही गुपचुपरित्या बोला किंवा मोठ्याने बोला प्रत्येकाच्या मनात जे - जे आहे, ते सर्व त्याला माहीत आहे. 14 ज्याने तुम्हाला निर्माण केले, त्यालाच (तुमच्याविषयी) प्रत्येक गोष्ट माहीत नसणार का ? त्याची बौद्धिक शक्ती अगाध आहे, (कोणासाठीही) अनाकलनीय अशी आहे. तोच प्रत्येक गोष्टीची जाणीव असणारा आहे.
15 त्यानेच पृथ्वीला तुमच्या अधीन करून टाकले. तर तुम्ही तिच्या भूभांगावर संचार करा. आणि त्याने दिलेल्या उपजिविकेतून खा, आणि (हे नेहमी लक्षात ठेवा की, शेवटी) पुनरुत्थान होऊन त्याच्याकडेच परत जायचे आहे. 16 तुम्ही त्याच्यापासून स्वतःला सुरक्षित समजता का, जो आकाशात आहे. (म्हणजेच अल्लाहपासून)? की , तो तुम्हाला जमिनीत गाडून टाकू शकत नाही ? पाहा जेव्हा ती कंपित होते (तेव्हा काय होऊ शकते?) 17 किंवा जो आकाशात आहे, त्याच्यापासून तुम्ही निर्भय झाला आहेत का? की, तो तुमच्यावर दगडांचा वर्षाव करणारे तुफानी वादळ पाठवू शकत नाही ? पण तेव्हाच तुम्हाला कळून चुकेल की , किती (खरा) होता माझा इशारा. 18 आणि त्यांच्या पूर्वीच्या अनेकांनी (माझ्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून त्यास) खोटे ठरविले . तर कशी होती माझी नाराजी (जी त्यांच्यावर प्रकट झाली)!
19 ते त्यांच्यावर उडणाऱ्या पक्ष्यांचे कधी (चिंतनपूर्वक) अवलोकन कारण नाहीत का, जे आपले पंख पसरवितात आणि (गरजेनुसार) ते आत मिटून घेत असतात. त्यांना थांबवून ठेवणारा कृपावंत (अल्लाहशिवाय) दुसरा कोणीच नाही. कारण तो सर्व गोष्टींवर नजर ठेवून असतो. 20 अशी कोणती सेना आहे, जी कृपावंत अल्लाहच्या विरुद्ध तुम्हाला साहाय्य करू शकेल ? सत्य नाकारणारे केवळ स्वतःची फसवणूक करीत आहेत ! 21 (अशाप्रकारे) अल्लाहने तुम्हाला उपजीविका प्रदान करणे बंद केले, तर (त्याच्याशिवाय) दुसरा कोण आहे जो तुम्हाला उपजीविका देऊ शकतो ? (हे सत्य उघड असतानाही,) हे केवळ हट्टापोटी विद्रोहाची आणि सत्यापासून दूर जाण्याची भूमिका घेत आहेत.
22 जो माणूस आपल्या चाऱ्यावर लोटांगण घालून चालतो, तो सन्मार्गावर असू शकतो की , जो सरळ मार्गावर, सरळ ताठ मान ठेवून चालतो तो ? 23 त्यांना सांगा, 'तोच आहे (अल्लाह) ज्याने तुम्हा सर्वांना निर्माण केले आणि तुमच्यासाठी कान , डोळे व हृदये बनविली, पण तुम्ही (अल्लाहप्रति) फारच थोडी कृतज्ञता दाखवता.' 24 त्यांना सांगा कि, तोच आहे (अल्लाह) ज्याने तुम्हाला पृथ्वीवर सर्वत्र पसरवून टाकले. आणि शेवटी (पुनरुत्थानाच्या दिवशी) तुम्हाला त्याच्याकडेच एकत्रित आणले जाणार आहे.
25 पण ते विचारतात, ' या (पुनरुत्थानाच्या) वचनाची पूर्तता होणार तरी केव्हा ? तुमच्या म्हणण्यात काही सत्य असेल, तर (आम्हाला उत्तर द्या). ' 26 (पैगंबर !) त्यांना सांगा, ' याचे ज्ञान केवळ अल्लाहला आहे आणि मी तर फक्त त्यापासून स्पष्टरित्या सावध करणारा आहे.' 27 पण जेव्हा ते वचन पूर्ण होण्यासाठी जवळ येत असल्याचे पाहतील, तेव्हा सत्य नाकारणाऱ्या लोकांचे चेहरे (दहशतीने) अगदी खिन्न होऊन जातील. आणि (तेव्हा) त्यांना सांगितले जाईल, ' हीच ती गोष्ट आहे, जिची (खिल्ली उडवत तिला आणण्याची) तुम्ही मागणी करीत असत.' 28 (पैगंबर !) त्यांना सांगा '(या जगात) अल्लाह मला व माझ्याबरोबर असलेल्या लोकांना नष्ट करेल किंवा आमच्यावर दया करेल. पण (यानंतरच्या जगात) सत्य नाकारणाऱ्यांना त्या (कायमस्वरूपी) दुःखदायी शिक्षेपासून कोण वाचवू शकतो ? याविषयी तुम्ही कधी विचार केलात का ?' 29 त्यांना सांगा, ' तो कृपावंत अल्लाह आहे, आम्ही त्याच्यावरच श्रद्धा ठेवतो व त्याच्यावरच भरवसा ठेवतो. आणि तुम्हाला लवकरच कळून चुकेल की , कोण उघडउघड वाट चुकलेला आहे.' 30 (सत्य नाकारणाऱ्यांना) सांगा, ' तुम्ही यावर कधी विचार केला आहात का की , जर तुमचे सर्व पाण्याचे साठे जमिनीत अचानक लुप्त झाले तर (अल्लाहशिवाय दुसरा) कोण आहे, जो तुमच्यासाठी शुद्ध पाणी उपलब्ध करू शकतो ?'
________________________________
(अब्दूर रहमान चाऊस, नांदेड यांचे मराठीतले भाषांतर )
#######################
❣पवित्र ️कुराण पूर्ण श्रद्धा ठेवून वाचल्यावर आणि पूर्ण अभ्यास केल्यावर प्रत्येकाला असे समजते की, इस्लाम धर्म तेव्हापासून आहे, जेव्हापासून सगळ्यात पहिले मनुष्य 'आदम' (a) साधारणतः 6000 वर्षांपूर्वी या पृथ्वीवर (स्वर्गातून श्रीलंकेत उतरविले गेले) आले. नंतर ते इराक मध्ये राहिले. म्हणूनच आदीमानव, आदमी, आदम सेतू अशी नावे आली.
️मुहम्मद (s.a.w.) 1400 वर्षांपूर्वी आले होते. दोघेही अनुक्रमे सर्वात प्रथम आणि सर्वांत शेवटचे पैगंबर (अल्लाहचा संदेश पोहोचविणारे) होते. मधील काळात खूप पैगंबर आले.
❣️मुहम्मद (s.a.w.) येण्याच्या आधी अल्लाहला 'यहोवा ' या नावाने संबोधले जायचे. त्या वेळची त्यांची भाषा हिब्रू होती.
❣️अल्लाहचा संदेश, एका स्वर्गदूतद्वारा (जिब्राईल अ.) पोहोचविला जायचा. ज्याला ' प्रकट होणे ' (revealation) असे म्हटले जायचे. जेव्हा जिब्राईल यायचे, तेव्हा मुहम्मद यांना खूप घाम यायचा आणि कधी कधी एका घंटी सारखा आवाज यायचा.पूर्ण आकाशात जिब्राईल सामावले आहे असे वाटायचे आणि त्यांचे पंख आहेत असे वाटायचे. स्वर्गदूत ( फरिश्तेे , मलाईका angle) हे प्रकाशाने बनलेले आहेत आणि ते अल्लाह चे आदेश पाळत राहतात.
❣️संदेश पैगंबरांच्या आठवणीत राहायचा, पाठ (recite) होऊन जायचा. [कारण आठवणीत ठेवण्याची जबाबदारी ईश्वराने घेतली होती, बुध्दी शेवटी अल्लाहनेच (ईश्र्वरानेच) बनवली आहे.]
❣️आधी पूर्ण ग्रंथ त्यावेळचे लोक पाठ करून ठेवायचे. तेवढे श्रम ते आनंदाने घ्यायचे. त्यामुळे हा ग्रंथ त्यांच्या मनात साठवला जायचा. पण नंतर लोकांना वाटले, की येणाऱ्या पिढ्यांसाठी ग्रंथ लिहून ठेवावा.
❣️ग्रंथ लिहितांना त्यात काही चूक होऊ नये म्हणून पूर्ण दक्षता घ्यावी लागत असते. कारण अल्लाह ने जे वर्तविले, ते चुकून ही बदलण्याचा अपराध होऊ नये यासाठी.
❣️ तोराह, जबूर, बायबल हेही अल्लाह (यहोवा, ईश्वर) चेच ग्रंथ आहेत, जे पॅलेस्टाईन (इस्राइलच्या जवळ) च्या वेगवेगळ्या भागात प्रकटीकरण झालेले ग्रंथ आहेत. कुराण हा ग्रंथ काही मक्का आणि काही मदीना मध्ये प्रकट झाला. तोराह आणि जबूर हा ज्यू धर्माचा आणि बायबल हा ख्रिश्चन धर्माचा ग्रंथ आहे. त्या ग्रंथातील बराचसा अंश, कुराण मधील काही अंश सारखाच आहे. पण त्यांत लोकांकडून बदल केला गेला.
*वरील काही तथ्य आहेत,जे प्रश्न विचारले गेल्यावर, माहीत असले पाहिजे.
====°°°====°°°====°°°====°°°==..
टिप्पण्या