79 अन - नाजिआत
*आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.
1 त्या ( वाऱ्यांची) शपथ जे प्रचंड शक्तीने सर्व काही उपटून काढतात. 2 आणि त्या वाऱ्यांची जे हळुवार वाहतात. 3 आणि त्या ( ढगांची,) जे वेगाने तरंगत असतात. 4 आणि त्यांची, जे एकमेकांच्या पुढे जातात. 5 त्यांची, जे ( निर्मात्याच्या ) आदेशांना अमलात आणतात. 6 ज्या दिवशी भयानक भूकंपाने ( संपूर्ण पृथ्वी ) हादरून जाईल. 7 आणि त्या पाठोपाठ ( आणखी ) हादरे बसतील. 8 त्या दिवशी ( लोकांची) हृदये ( त्या दहशतीमुळे वेगाने) धडधडू लागतील. 9 त्यांच्या नजरा खाली खिळलेल्या असतील. 10 ( पुनरुत्थानास नाकारणारे) म्हणतात, '(मृत्यूनंतर) आम्हाला (जिवंत करून) पुन्हा पूर्वीच्या स्थितीत आणले जाणार का? 11 जेव्हा आम्ही जीर्ण हाडे बनलेले असू?' 12 ते म्हणतात, 'असे झाले, तर ते परतणे, नुकसानाची गोष्ट असेल. 13 ' (पण जेव्हा ती शेवटची घटका त्यांच्यावर येईल,) एका जोराची हाकाटी असेल. 14 आणि लगेच, ते ( सर्व जीर्ण हाडे झालेले) मैदानात हजर होतील!
15 तुम्हाला मूसाचा वृत्तांत पोचला का? 16 जेव्हा त्याच्या पालनकर्त्याने तुवाच्या पवित्र खोऱ्यापाशी त्यास हाक दिली होती. 17 (आणि म्हटले), ' फिरऔनकडे जा, तो सर्व मर्यादा ओलांडून विद्रोही बनलेला आहे.' 18 आणि त्याला सांगा, 'तू ( मार्गभ्रष्टतेच्या घाणीपासून ) स्वतःला शुचिर्भूत करू इच्छितोस का?' 19 तू ईशभिरु बनावेस म्हणूस मी तुला तुझ्या पालनकर्त्याचा मार्ग दाखवू का?' 20 त्यानंतर मूसाने त्याला ( अल्लाहच्या सामर्थ्याची एक ) मोठी खूण दाखविली. 21 पण त्याने खोटे ठरविले व मानण्यास नकार दिला. 22 (मूसाच्या विरुद्ध ) उपाय योजण्यासाठी तो बेमुरवतपणे तिथून निघून गेला. 23 आणि त्याने आपल्या सर्व लोकांना एकत्र बोलाविले. 24 आणि म्हणाला, 'मीच तुमचा सर्वश्रेष्ठ भाग्यविधाता आहे. ' 25 पण अल्लाहने त्याच्या मुसक्या आवळल्या ( आणि विद्रोही माणसाचा) या जगात व यानंतरच्या जगात (कसा शेवट होतो याचा इशारा देणारे उदाहरण त्याला बनविले ). 26 निःसंदेह, यात प्रत्येक ईशभिरु माणसासाठी धडा आहे.
27 (लोकांनो !) तुम्हाला निर्माण करणे अधिक कठीण आहे की, त्या आकाशाला निर्माण करणे ( अधिक कठीण आहे), ज्याला अल्लाहने निर्माण केले आहे. 28 त्याचे ( विशाल ) घुमट उंच स्थापित केले आणि त्यास दोषरहित बनवले. 29 आणि त्याने त्याची रात्र काळोखी बनविली व त्यातून प्रकाशमान दिवस प्रकट केला. 30 आणि त्यानंतर पृथ्वीला विस्तीर्ण केले. 31 आणि तिच्यातून तिचे पाणी काढले व चारा निर्माण केला.32 आणि पर्वतांना तिच्यावर भक्कमपणे स्थापित केले.
33 हे सर्व तुमच्या आणि तुमच्या गुराढोरांसाठी उपजीविकेचे साधन आहे. 34 आणि जेव्हा ते भयंकर संकट येईल. 35 त्या दिवशी माणसाने ( जगात) जे-जे केले आहे, ते त्याला आठवेल. 36 आणि पाहणाऱ्यासाठी नरक प्रकट केला जाईल. 37 ज्याने उद्दामपणे वर्तन केलेले असेल. 38 आणि केवळ जगातील जीवनास प्राधान्य दिलेले असेल. 39 तर नरक अशाच माणसाचे अटळ ठिकाण आहे. 40 पण जो आपल्या पालनकर्त्यासमोर ( हजार होऊन जाब द्यावा लागणार) अशी जाण ठेवून होता. आणि ज्याने वाईट मनोकामनाचे अनुसरण करण्यापासून स्वतःचे रक्षण केले असेल. 41 तर स्वर्ग त्याचे ठिकाण असेल. 42 (पैगंबर!) ते त्या शेवटच्या घटकेविषयी विचारतात की, ती केव्हा येणार आहे? 43 पण तिच्याविषयी तुम्ही कसे सांगू शकणार ? 44 ( कारण) ती केव्हा येईल, हे केवळ तुझ्या पालनकर्त्यालाच माहीत आहे. 45 तुमचे काम त्यांना केवळ सावध करणे एवढेच आहे, जे तिचे भय बाळगतात. 46 त्या दिवशी जेव्हा ते ती पाहतील, तेव्हा त्यांना वाटेल की, ते केवळ एक संध्याकाळ किंवा एक सकाळ यापेक्षा जास्त (मृत्यूपूर्वीच्या) जगात राहिले नाहीत.
============================
अनुवादक-अब्दुर -रहमान चाऊस ,नांदेड
टिप्पण्या